||10 सुंदर मराठी बोधकथा |Best Marathi Bodh Katha ||
||Best Marathi Bodh Katha ||
वेळ आली होती…
एक विरळ वस्ती असलेले गाव होते. पावसाळ्यात तेथे बऱ्याचदा साप निघायचे. एक दिवस असाच एक चांगला दीड फूट लांबीचा साप बिळातून बाहेर आला, साप सळसळत घरात शिरला. घरातले लोक खूप घाबरले. त्यांचा आरडा ओरडा ऐकून गावातले लोक तेथे जमले. तेथे आल्यावर लोकांना समजले की, इथे साप आलाय. काहींनी काठ्या आणल्या होत्या. म्हणाले, मारायचा का साप ? सांगा. काहीजण म्हणाले, मारा, मारा! पण घराच्या मालकाने विरोध केला. तो म्हणाला, कशाला मारायचं बिचाऱ्याला. त्यांना देखील जगण्याचा हक्क आहेच की, त्यावर एकजण म्हणाला, अरे, प्रत्येक जन्माला आलेला जीव एक ना एक दिवस मरतोच की. आपल्याला त्रास होणार.
असेल तर त्याला मारलेलेच बरे की. त्यावर घरमालक म्हणाले,त्याला त्याचे नैसर्गिक आयुष्य जगू दे की. मी सर्पमित्राला फोन करून बोलावले आहे. येईलच तो १५-२० मिनिटात. तो येईपर्यंत वाट बघा.
त्या सापाला मारायचे नाही तर त्याला जीवदान द्यायचे असे ठरले. सगळे जण त्या सापाचे नुसते निरीक्षण करीत होते. साप घरातून बाहेर आला. आता तो कोठे जातोय याकडे सगळ्यांचे लक्ष होते. साप सरपटत सरपटत एका डबक्याजवळ गेला.
त्या डबक्यात एक मोठा ‘बुलफ्रॉग’ म्हणजेच राक्षसी आकाराचा बेडूक बसलेला होता. तो बेडूक साधारण एक वीतभर लांब होता. हा बेडूक काहीही
खातो. त्याला बहुतेक भूक लागलेली असावी. हा साप पळून जाण्यासाठी त्या डबक्यात गेला तो नेमका त्या बेडकाजवळ आला. दोघांची समोरासमोर गाठ पडली.
‘बुलफ्रॉग’ संधीसाधू होता. त्याने त्या दीड फूटी सापाला झडप घालून आपल्या जबड्यात पकडले. साप त्याच्या जबड्यातून सुटण्याचा प्रयत्न करीत होता. पण बेडकाची पकड घट्ट होती. सगळेजण हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. साप बेडकाला खातो हे सगळ्यांना माहीत होते. पण आज मात्र बेडूक सापाला खात होता.
१५-२० मिनिटे हा थरार लोक अनुभवत होते. सर्पमित्रांना फोन केला होता. ते यायला पंधरा-वीस मिनिटे लागणार होती. ते तेथे पोहोचले तेव्हा त्या
राक्षसी बेडकाने तो साप अर्ध्याहून जास्त खाऊन टाकला होता. आता कोण कसे वाचवणार होते त्याला?
सर्पमित्रांनी त्या राक्षसी बेडकाला त्या डबक्यातून उचलून लांब एका पाणथळ जागी नेऊन सोडले. काय घडले होते ते सगळ्यांनीच पाहिले होते.
सापाला काठीने मरण आले असते तर ते मरण घडवून आणलेले असते. पण आता मात्र सापाला नैसर्गिकच मरण आले होते. त्या सापाचा काळ आला नव्हता, पण वेळ मात्र आली होती.
जंगलात वाट चुकलेला संगीतकार
एक होता संगीतकार. त्याच्या हातात नेहमी एक गिटार असायची. सतत त्याच्या डोक्यात संगीताचाच विचार सुरू असायचा. त्याला जेव्हा एखादी धून सुचायची तेव्हा तो थांबून ती धून वाजवून बघायचा. त्याला नेहमी शांत ठिकाणी जायला आवडायचे.
असाच तो चालत-चालत निघाला. चालता चालता तो जंगलात कधी पोहोचला त्यालाच समजले नाही. तो आपल्याच धूनच्या नादात होता. जेव्हा भानावर आला तेव्हा मात्र त्याची भीतीने घाबरगुंडी उडाली. लांबवर दृष्टी टाकली तर निर्जन जंगल आणि त्या निर्जन जंगलात हा एकटा. मागे फिरावे तर रस्ता सापडेना. कसे आलो हेच मुळी त्याला उमजेना. देवाचा धावा करू लागला. ;हे देवा, मी ह्या जंगलात फसलोय. मला कोणीतरी सोबतीला
पाठव.’
तो एका झाडाखाली बसला. आत्ता माझ्या ह्या एकटेपणात माझी ही गिटार
माझ्या सोबतीला आहे. ह्या विचाराने त्याला जरा हायसे वाटले. तो गिटार वाजवू लागला. तो अगदी देहभान विसरून गिटारवर धून वाजवत होता; जणू त्याची समाधीच लागली होती. असे बराच वेळ चालले होते. जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्याने डोळे उघडले. बघतो तो काय, समोर एक लांडगा बसलेला. लांडगा म्हणाला, व्वा! काय मस्त वाजवता! मी तर फार खुष झालो बुवा. मी येऊ का तुमच्या सोबतीला ?संगीतकार खूप घाबरलेला होता, चटकन् म्हणाला, नको नको!
संगीतकार पुन्हा गिटार वाजवू लागला. ते सूर ऐकून तेथे एक कोल्हा आला. तो देखील संगीताची धून ऐकण्यात रममाण झाला. बापरे ! इकडे हा लांडगा, आता आलाय कोल्हा. आता दोन-दोन प्राणी. बापरे ! कोणीतरी सोबत हवी
होती खरी पण ह्या प्राण्यांची नको. मनातल्या मनात त्याने पुन्हा देवाचा धावा सुरू केला. हे दोघे त्याच्या मागे मागे येऊ लागले. त्याने भीतीने गिटार वाजवायला सुरुवात केली. तो एक ससा आला. सशाची भीती नाही वाटली पण त्याला या जंगलातून बाहेर पडण्यासाठी वाट दाखविणारा सोबती हवा होता. ह्या प्राण्यांचा काय उपयोग? आता ह्या प्राण्यांपासून सुटका व्हावी एवढीच त्याची इच्छा होती.
ससा येताच कोल्हा आणि लांडगा त्याच्या मागे लागले. हे पाहताच संगीतकाराने तेथून पळ काढला. पाहतो तर समोर एक लाकूडतोड्या लाकडे तोडत होता. त्याला पाहताच संगीतकाराला हायसे वाटले. लाकूडतोड्या म्हणाला, तुम्ही जंगलात चुकलेले दिसता.संगीतकार म्हणाला, हो ना, ही गिटार वाजवता वाजवता ह्या जंगलात कधी शिरलो मला समजलेच नाही. मला या जंगलातून बाहेर पडेपर्यंत सोबत कराल का?
लाकूडतोड्या म्हणाला, ;करतो की सोबत, दावतो की रस्ता. पण मला एक डाव ह्ये काय हाय त्ये वाजवून दावाल?संगीतकार हसून म्हणाला, हो दाखवतो. पाहा, ह्या वाद्याला गिटार म्हणतात.लाकूडतोड्या म्हणाला, ;असू द्या असू द्या. काय त्ये गटार का गिटार वाजवून दावाच .
संगीतकार लाकूडतोड्याच्या मागे गिटारवर धून वाजवत चालला होता. जंगलातून दोघे बाहेर कधी आले त्यांनाच समजले नाही. दोघांनीही एकमेकांचे आभार मानले. खरंच, आज लाकूडतोड्या अगदी देवासारखाच भेटला.
आळशी गोपाळ
गोपाळ म्हणजे अगदी मुलखाचा आळशी. अंथरूणात सारखे लोळायचे हाच जणू त्याचा छंद होता. आई त्याला सारखी रागवायची. पण गोपाळवर त्याचा काही परिणाम व्हायचा नाही. आई त्याला उठवायला गेली, की म्हणायचा, ए आई, झोपू दे की जरा. पाच मिनिटांनी उठतो.’
कधीतरी आईने झोपेतून उठविले की म्हणायचा, काय गं आई, कशाला उठवलेस, किती छान स्वप्न पडले होते. आई चिडून म्हणायची, कसलं आलंय तुझं स्वप्न, त्यातही तू झोपलेलाच असशील ना.
गोपाळ आळशी असल्याने त्याचे धड शिक्षण देखील नाही झाले. कोणतेही काम त्याला धड जमत नसे. जरा काम केले की म्हणायचा, दमलो बाबा !आई म्हणायची, एवढा मोठा झाला आहेस. कामधाम करत नाहीस. मग तुला मुलगी कोण देईल? लग्न कसं होणार तुझं !
गोपाळला आईने एक गाय घेऊन दिली. आता त्या गाईच्या देखभालीमुळे गोपाळला झोपायलाच मिळेनासे झाले. गोपाळच्या मनात विचार आला. चला,
काही दिवस जरा काम केले तर निदान आपले लग्न तरी होईल. मग काय बायकोच करेल सगळे काम. मग मी झोपायला मोकळा.
आता गोपाळ नीट काम करू लागला आहे असे वाटून आईने त्याच्यासाठी मुलगी पाहिली. गोपाळ तर काय गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसला होता. गोपाळचे लीनाशी लग्न झाले. तिच्या आईने तिला लग्नात आंदण म्हणून एक मधुमक्षिका पेटी दिली. लीनाला गोपाळ म्हणाला, आता ना आपण आपल्या कामाची अदलाबदल करू या. तुझी मधमाशीची पेटी मी सांभाळतो, तू माझी गाय सांभाळ.लीना म्हणाली, ठीक आहे. ‘
लीना देखील कामचुकार, आळशी होती. तिला वाटले गाईचे काय करावे लागणार? तिला चरायला महादूच नेतो. नंतर गोठ्यात तर बांधलेली असते. इकडे गोपाळला वाटले मधमाशाच मध गोळा करून आणणार. आपल्याला मस्त झोपायला मिळेल.
काही दिवसांनी मधुमक्षिका पेटीत पाहिले तर मधमाशांनी मध गोळा केला होता. लीनाला म्हणाला,;तू मला हे मध कसे काढायचे ते दाखव.लीनाने
एका काचेच्या जारमध्ये मध गोळा केला. आता गोपाळ म्हणाला, ;तुझे रोजचे काम करून ये जा. गोठा साफ कर. गाईला पाणी ठेव. चारा घाल. मग दूध काढ.
लीना खरं तर गोपाळवर चिडली होती. सगळे काम मला करायला लावतो हे तिला कळून चुकले होते. ती देखील मनापासून काम करतच नव्हती. कधीच तिने गायीच्या अंगावरून मायेने हात फिरवला नाही, की तिचे कौतुक केले नाही. ती धार काढायला गेली आणि गायीने जोरात लाथ मारली. हातातली दुधाची चरवी खाली पडली आणि सगळे दूध जमिनीवर.
इकडे गोपाळच्या हातातून मधाचा जार निसटला आणि फुटला. झाले, एवढ्या दिवसांच्या मधमाशांच्या श्रमावर पाणी पडले. दोघांकडून नुकसान झालेले पाहून गोपाळच्या आईने तर डोक्यालाच हात लावला.
दोघांनाही कळून चुकले की हे सगळे काही आपल्या आळशीपणाचे फळ आहे. दोघांनी आळस झटकून कामात लक्ष घालायचे असा निश्चय केला.
भाग्यवान विक्रम
एक विक्रम नावाचा मुलगा होता. खूप धाडसी होता. त्याला प्रवासाची खूप आवड होती. तो एकटाच प्रवासाला निघायचा. त्याला सगळे सांगायचे, एकटा रात्रीचा प्रवास करत जाऊ नकोस. पण विक्रम म्हणायचा, ;मला काहीही होणार नाही. परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. तो माझे रक्षण करील.
विक्रम प्रवास करायचा. पण रात्री झाडावर उंच चढून बसायचा. त्यामुळे त्याचे हिंस्त्र श्वापदांपासून रक्षण व्हायचे. एक दिवस असाच रात्री तो झाडावर बसलेला असताना त्याला बैलाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याने झाडावरून खाली बघितले तर त्या बैलाची एका हरणाशी मारामारी चालली होती. बैल मोठमोठ्याने
ओरडत होता. हरिण त्याला भारी पडत होते. शेवटी
हरणाने त्या बैलाला ठार मारले. विक्रम खूप घाबरला होता; तरीही त्याने धाडसाने हरणाचे शिंग पकडले आणि त्याच्याबरोबर पळू लागला.
थोड्या वेळाने ते हरिण थांबले. विक्रमने त्याचे शिंग सोडले. हरणाने एक खडक ओढला तर आत एक गुहा होती. हरिण मनुष्यवाणीने बोलू लागला. विक्रम गोंधळून गेला. पण हरणाने त्याला ओढले आणि म्हणाले, ;चल, लवकर आत ये.
विक्रम गुहेतून आत गेला. आत खूप मोठे दालन होते. त्या दालनात एक पारदर्शक पेटारा होता. त्यातून एक गढी दिसत होती. पुढे गेल्यावर दुसरा पेटारा दिसला. त्या पेटाऱ्यात एक सुंदर मुलगी होती.
विक्रमने पेटाऱ्याला हात लावताच त्याचे झाकण उघडले आणि ती सुंदर मुलगी उठून बसली. आणि त्याचवेळी त्या हरणाचे रूपांतर एका देखण्या मुलात झाले. हे दृश्य पाहून विक्रम आश्चर्यचकित झाला.
ती सुंदर मुलगी एक राजकन्या होती आणि ते हरिण म्हणजे त्या राजकन्येचा भाऊ होता. एका दुष्ट जादूगाराने त्यांना शाप दिला होता. त्याच्या शापामुळे राजकन्या दीर्घकाळ निद्रावस्थेत होती, तर राजपुत्राचे रूपांतर हरणात झाले होते. स्वत: त्या जादूगाराने स्वत:चे रूपांतर बैलामध्ये करून घेतले होते.
हरणाच्या रूपातील राजपुत्राला कळले होते, की हा बैल म्हणजेच तो दुष्ट जादूगार आहे. त्याला ठार मारल्याशिवाय आपण ह्या शापातून मुक्त होणार नाही, हे त्याला माहीत होते. म्हणूनच तो त्या बैलाच्या शोधात होता. नेमका बैल त्याच झाडाखाली आश्रयाला आला, ज्या झाडावर विक्रम बसला होता.
राजकन्या झोपेत असताना तिला वारंवार स्वप्न पडायचे. आणि त्या स्वप्नात तिला हा विक्रम दिसायचा. विक्रमला पाहून तिला खूप आनंद झाला होता. तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळाला होता. तिने विक्रमशी लग्न केले.
विक्रमने त्या पारदर्शक पेटाऱ्याचे झाकण उघडले. त्याच क्षणी आत दिसणारी गढी मोठी झाली. त्यात त्यांचा राजवाडा दिसू लागला. सर्वजण राजवाड्यात गेले. राजबिंडा राजपुत्र आता राजा झाला. राजकन्या विक्रमसह त्या राजवाड्यात राहू लागली. खरेच, विक्रम किती भाग्यवान होता!
संस्कार
रमेशबाबू पुण्याला जायला निघाले होते. वाटेत चहा पिण्यासाठी थांबले. त्यांना एक दहा-बारा वर्षे वयाचा, साधे कपडे घातलेला, चुणचुणीत मुलगा दिसला. त्यांच्या लक्षात आले की हा मुलगा आपल्याभोवती घोटाळतोय. तो एका आडोशाला उभे राहून त्यांच्याकडे बघत आहे. त्याने आपल्या हातातील काहीतरी मागे लपविले आहे.
रमेशबाबूंच्या मनात विचार आला. कोण असेल हा मुलगा, त्याने मागे काय लपविले आहे? त्याला काही हवे आहे, काही दाखवायचे आहे? त्यांनी त्याला जवळ बोलावले. तो मुलगा आल्यावर त्यांनी विचारले, काय रे, तुला भूक लागलीय का? काही खायला हवे आहे का?
त्यावर त्या मुलाने नकारार्थी मान हलविली. पाठीमागे लपविलेले एक जाड पुश्याचे पॅड आणि एक निबंधाची वही त्याने त्यांना दाखविली. पेन दाखवून
म्हणाला,;पेनाची नळी संपलीय… घेऊन द्या ना!रमेशबाबूंनी पाच रुपये देऊ केले तर त्याने ते घेतले नाहीत. म्हणाला, पैसे नकोत, नळी द्या. रमेशबाबू म्हणाले, अरे, दुकानातून तू घे ना. त्यावर तो मुलगा म्हणाला, नको, माय म्हणते, कुणाकडून फुकटचे पैसे घ्यायचे नाहीत. तू जर फुकटचे पैसे घेतलेस तर माझे आयुष्य कमी होईल. आईने केलेल्या संस्कारामुळे तो पैसे घेत नाही म्हंटल्यावर रमेशबाबू गाडीतून खाली उतरले. त्यांनी जवळच्या टपरीवरील दुकानातून त्याला पेन घेऊन दिले.
पेन मिळताच त्याचा चेहरा खुलला. मग रमेशबाबूंनी त्याला त्याचे नाव विचारले. तो म्हणाला, बंड्या. मी झेड. पी. च्या शाळेत जातो. सहावीत आहे. इथे जवळच एका झोपडीत राहतो. माझा बा आणि माय दोघेही शेतात मजुरी करतात. मला चार भावंडे आहेत. नाव काय ह्या प्रश्नाचे बंड्याने एवढे मोठे उत्तर दिले.
रमेशबाबूंनी त्याला विचारले, पण या पेनाने तू काय लिहिणार आहेस? बंड्या मोठ्या उत्साहाने म्हणाला, मी आता या पेनाने ‘आई’ या विषयावर निबंध लिहिणार आहे. छान! पण मोठेपणी तुला कोण व्हायचंय ? रमेश बाबूंनी विचारले.
त्यावर बंड्या म्हणाला, फौजदार असे म्हणताना त्याने एक कडक सॅलूट ठोकला. फौजदारच का व्हायचंय ?रमेशबाबूंनी विचारले. बंड्या उत्तरला, आमच्या गुरुजींनी सांगितलंय, तू खूप अभ्यास केलास तर फौजदार होशील.मग काय करतोस ना अभ्यास? बंड्याने होकारार्थी मान हलवली.
रमेशबाबूंना एक प्रश्न पडला की, एवढे लोक इथे असताना या मुलाने माझ्याकडेच पेन का मागितले? मग त्यांनी न राहवून बंड्याला विचारले. बंड्या म्हणाला;मी सगळ्यांकडे बघत होतो. बऱ्याच जणांनी टी शर्ट घातलेला. पण तुमच्या खिशाला फक्त पेन होते. म्हणून मी तुमच्याकडे पेन मागितले.
बंड्याचे संस्कार, त्याचे ध्येय, त्याची निरीक्षण शक्ती, प्रामाणिकपणा पाहून रमेशबाबूंनी आपल्या खिशाचे भारी पेन त्याला बक्षीस दिले.
साहस जीवावर बेतले…
राकेश आणि राजेश दोघांची घट्ट मैत्री होती. दोघेही सुखवस्तू कुटुंबातले. शिवाय एकुलते एक. त्यामुळे आई-वडिलांचे लाडके. त्यांना जे हवे ते आई- वडील आणून देत असत.
दोघेही एकत्र अभ्यास करायचे. यंदा ते बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. चांगले गुण मिळाल्याने पालक खूप खुष झाले. दोघांच्याही पालकांनी त्यांना मोटरसायकल घेऊन दिली. मोटरसायकल हातात आली आणि दोघांना किती फिरू असे होऊन गेले. दोघेही लांब-लांब जाऊन यायचे. दोघांना देखील वेगाचे प्रचंड वेड होते. सुसाट वेगाने जाण्यात त्यांना मजा यायची.
सिग्नल तोडणे, प्रवेश बंदी असूनही तेथून घुसणे, एकेरी वाहतूक असली तरी विरुद्ध बाजूने जाणे. एकंदरीत काय रहदारीचे सगळे नियम त्यांनी धाब्यावर
बसविले होते. कधी-कधी पोलीस त्यांना पकडायचे पण ते चिरीमिरी देऊन सुटायचे. एकदा तर नो पार्किंगमध्येच गाडी लावली. पोलिसांनी गाड्या उचलून नेल्या. दंड भरून सोडवून आणल्या. त्यांचे हे सगळे उद्योग घरी पालकांना माहीत देखील नसायचे.
एक दिवस त्या दोघांच्या मनात एक साहसी कल्पना आली. दोघांची शर्यत लावण्याची मनापासून इच्छा होती. आपण दोघेही मस्त शर्यत लावू या. त्यासाठी किती किलोमीटर अंतर जायचे यावर देखील त्यांनी चर्चा केली. खरं तर त्यांना मोटरसायकल वरून भारत भ्रमण करण्याची इच्छा होती; पण पालक परवानगी देणार नाहीत याची त्यांना खात्री होती.
सळसळते तरूण रक्त त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. मोठे साहस करण्याची इच्छा प्रबळ होत होती. झाले, शर्यत लावायचा निर्णय पक्का झाला. दिवस
देखील ठरला. शर्यत कुठून सुरू करायची आणि संपवायची कुठे हे देखील ठरले
शर्यतीचा दिवस उजाडला. दोघे ठरल्या ठिकाणी आपापली मोटरसायकल घेऊन आले. शर्यत सुरू झाली. दोघेही भान विसरून, वाऱ्याच्या वेगाने मोटर- सायकल चालवत होते. गर्दीतून सुसाट गाडी चालवणे खरं तर साहसच होते. हे साहस जीवावर बेतू शकते याचा विचारच त्यांच्या मनात नव्हता. फक्त जिंकण्याची इच्छा.
थोड्याच वेळात राकेशचा गाडीवरील ताबा सुटला. प्रचंड वेग असल्याने गाडीचा ब्रेकही लागला नाही. रस्त्यातून तो गाडीबरोबर फरफटत गेला आणि एका विजेच्या खांबावर जाऊन आदळला. डोक्याला जबरदस्त मार लागला. त्याबरोबर त्याची शुद्ध हरपली. खूप खरचटले होते. लोक धावत आले. बघता
बघता गर्दी झाली. राकेशच्या खिशात मोबाईल होता. त्यावरून त्याच्या घरी फोन करून लोकांनी कळविले. जवळच्याच हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केले.
आई-वडील आले. आपल्या तरूण एकुलत्या एक मुलाची स्थिती त्यांना बघवत नव्हती. डॉक्टर कसलीच खात्री देत नव्हते. प्रयत्न सुरू होते. आता सारे परमेश्वराच्याच हातात !
राकेशची आई हॉस्पिटलमधील गणपतीला प्रार्थना करीत होती. हात जोडून त्याला साकडे घालत होती. मुलाने मूर्खासारखे भलते साहस केले त्याला देव तरी काय करणार? जणू देव म्हणत असावा….
आयुष्य बदलण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळतो. पण वेळ बदलण्यासाठी मात्र पुन्हा आयुष्य मिळत नाही. साहस करताना विचार करा. लक्षात ठेवा. काळ आणि वेळ सांगून येत नाही. ‘
मह्या गुरूजींची गाडी
डोंगरगाव नावाप्रमाणेच डोंगराच्या कुशीत वसलेले गाव. शहरापासून तुटल्यासारखे. गावातील लोकांचे जीवन खूप कष्टमय. गावात एक शाळा होती. बऱ्याच दिवसांनंतर आज शाळेत गुरूजी येणार होते. कोणीच शिक्षक आडगाव असल्यामुळे यायला तयार व्हायचे नाहीत. शिक्षकांविना शाळा कशी चालणार? मुले दिवसभर उनाडक्या करायची, अगदी मोकळ्या सुटलेल्या जनावरासारखी!
गुरूजी शाळेत दाखल झाले. गुरूजी खूप तरूण आणि तडफदार होते. उनाड मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी त्यांना खूप प्रयोग करावे लागले. आता मुलांची पावले शाळेकडे वळू लागली. हळूहळू ती अभ्यास करू लागली. गुरूजी मुलांना गोष्टी सांगायचे. गाणी शिकवायचे. त्यांची नाटके देखील बसवायचे. गुरूजी आणि मुले यांचे नाते घट्ट होत होते.
गावात वाहनाची सोय नव्हती. शहरात जायचे तरी कठीण होते. कामासाठी गुरूजींना वारंवार गावाबाहेर जावे लागायचे. जाण्या-येण्यासाठी वेळ देखील खूप वाया जायचा. म्हणून गुरूजींनी कर्ज काढून एक मोटर सायकल विकत घेतली. गुरूजींची गाडी आली आणि मुलांना खूप आनंद झाला. गुरूजी म्हणाले, मुलांनो, ही आपली गाडी आहे. याच्याकडे नीट लक्ष द्यायचे काय. कोणालाही या गाडीवर बसू द्यायचे नाही. गाडी खराब करायची नाही.’
मुले अगदी स्वत:ची गाडी असल्याप्रमाणे गाडीवर लक्ष देऊ लागली. गाडी स्वच्छ करायची देखील त्यांची तयारी होती. मुले गाडीची काळजी घेताहेत हे पाहिल्यावर गुरूजी निश्चिंत झाले.
एक दिवस गुरूजींना बाहेर जायचे होते. त्यांनी गाडी पुसली. किल्ली लावत असताना त्यांच्या लक्षात आले, कोणीतरी गाडीवर खिळ्याने कोरून काहीतरी
लिहिले आहे. ते बघताच त्यांचा रागाचा पारा चढला. त्यांनी सगळ्या मुलांना बाहेर बोलावले. गुरूजी रागावले आहेत हे सगळ्यांना जाणवत होते. सगळी मुले खाली मान घालून गप्प उभी होती. चिडीचूप शांतता पसरली.
गुरूजी कडाडले. त्यांच्या हातात छडी होती. ती छडी जमिनीवर आपटत मुलांना विचारले, गाडीवर हे कोणी लिहिले? कोणीच काही उत्तर देत नाही पाहिल्यावर गुरूजी अजूनच भडकले. ती गाडी म्हणजे गुरूजींना जीव की प्राण होती. आपल्या वस्तूची, त्यातून लाडक्या वस्तूची खराबी झालेली त्यांना सहन होत नव्हती.
प्रत्येकजण चोरट्या नजरेने एकमेकांकडे पाहात होते. वातावरण तापत चालले होते. तेवढ्यात शाळेतील छोटी मुलगी सगुणा भीतभीत पुढे आली. म्हणाली, गुरूजी, म्या लिवलं. गुरूजी जास्तच भडकले. का लिहिलंस?
का खराब केलीस माझी गाडी? मी तुम्हाला काय सांगितले होते? गाडीची काळजी घ्यायची. अशी घेतात काळजी?
सगुणा म्हणाली, गुरूजी, काळजी वाटली म्हणूनच लिवलं.काळजी वाटली म्हणून गाडी खराब केलीस? सरांचा तोंडाचा पट्टा चालूच होता. गुरूजी शांत झाल्यावर सगुणा म्हणाली,गुरूजी, गावातल्या अण्णांची गाडी काल कुनीतरी चोरली. मले वाटले, मह्या गुरूजींची गाडी कुनी चोरली तर! कुनी ती चोल नाय म्हून म्याच लिवलं, ‘मह्या गुरूजींची गाडी. ‘
तिचा निष्पापपणा पाहून गुरूजी वरमले. त्यांना उगीच रागावलो असे वाटले. त्यांनी छोट्या सगुणाला जवळ घेतले. शाबासकी दिली. आजही गुरुजींनी ते खिळ्याने कोरलेले वाक्य जपून ठेवले आहे. तो त्यांना मोठा पुरस्कार वाटतो.
नवी जाणीव…
श्रावण महिना आला. व्रत वैकल्यांना ऊत आला. तो श्रावणातला पहिलाच शनिवार होता. नेहमीसारखीच सकाळची शाळा होती. मधली सुट्टी झाली. सगळ्यांनी आपापले डबे उघडून खायला सुरुवात केली. मोहनने मात्र डबा आणला नव्हता. तो तसाच त्याच्या जागेवर गप्प बसून राहिला होता. थोड्याच वेळाने त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला.
सगळ्या मुलांचा मोहनभोवती गराडा पडला. नुसता गोंधळ चालू होता. बाई आल्या आणि सगळ्यांना पांगवले. त्यांनी मोहनच्या तोंडावर पाणी मारले. थोडे पाणी पाजले. कालपासून खरं तर मोहन उपाशी होता आणि त्याचमुळे त्याला चक्कर आली होती. बाईंनी त्याला त्यांच्या डब्यातील पोळीभाजी खायला दिली.
समीर या घटनेमुळे खूप अस्वस्थ झाला. मोहनचे वडील अर्धांगवायू झाल्याने अंथरूणाला खिळलेले. काम तरी कसे करणार? आई चार घरच्या पोळ्या करायची. त्यात कसं घर भागणार? शिवाय मोहनला छोटी बहीण देखील होती. त्याची अशी हलाखीची परिस्थिती पाहून समीर दुःखी झाला.
घरी गेला आणि काकूचा फोन आला. काकू शेवटच्या शनिवारी चार मुलांना जेवायला घालणार होती. म्हणून ती म्हणत होती, तुझ्या तीन मित्रांना घेऊन माझ्याकडे जेवायला ये. समीरने काहीच उत्तर न देता फोन ठेवला म्हणून तिला राग आला.
समीर गप्प बसलेला पाहून आईने विचारले, काय रे समीर, काही होतंय का?खूप खोदून खोदून विचारल्यावर समीरने मोहनबद्दल आईला सांगितले. आई म्हणाली,बाळा, आपण तरी काय मदत करणार ?
समीर चिडला. म्हणाला, का आपण काहीच नाही करू शकत. आठवड्यातून एकदा जेवायला नाही घालू शकणार? अगं, काकू पुढच्या शनिवारी चार मुलांना जेवायला घालणार आहे. मोहनला आणलं तरी चालेल का विचारलं तर म्हणते कशी? त्याची मुंज झाली आहे का? त्यावर आईने समीरला जवळ घेत समजावले. म्हणाली, अरे, मुंज झालेल्या मुलांनाच जेवायला बोलवावं लागतं. का? मुंज झालेल्या मुलांनाच पोट असतं, त्यांनाच भूक लागते? ज्यांना घरात खूप खायला मिळतं; त्यांना गरज नसताना खायला घालायचं आणि ज्याला गरज आहे त्याला केवळ मुंज झालेली नाही म्हणून बोलवायचं नाही. समीर तावातावाने बोलत होता.
मोहन खूप हुशार आहे. मेहनती आहे. त्याला अभ्यास करण्यासाठी ताकद नको? त्यासाठी त्याला जेवायला नको? अशा मुलाला जेवायला घातलं तर ते सत्पात्री अन्नदान होईल. त्याचा आत्मा शांत झाला तर तो तुम्हाला दुवा देईल.
आईला त्याचं म्हणणं पटलं. ती म्हणाली, समीर, एवढा लहान असून तू किती छान विचार करतोस. आणि आम्हा मोठ्यांना मात्र असं सुचलं नाही. बोलव हं! मोहनला दर शनिवारी शाळा सुटल्यावर जेवायला घेऊन येत जा. खरंच समीर, तू ‘नवी जाणीव’ करून दिलीस!
मित्रानो जर तुम्हाला आमच्या गोष्टी आवडल्या असतील तर आम्हाला तुमचा विचार कळवा . मराठी मनोरंजन यावरील गोष्टी तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.