|| bodh katha | बोधकथा ||
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/मराठी-मनोरंजन-300x169.png)
१. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/a3-300x198.jpg)
अंकलेश्वर नावाचे एक राज्य होते. गोरक्ष नावाचा राजा तिथे राज्य करत होता. राणी सुमित्रा आणि राजकन्या कांचनमाला दोघीही खूप प्रेमळ होत्या. राज्यात सगळीकडे शांतता आणि सुबत्ता होती.
कांचनमाला चांगल्या वातावरणात लहानाची मोठी झाली होती. ती दिसायला खूप सुंदर आणि ती स्वभावानेही खूप चांगली होती. शेजारीच कुंडलपूर नावाचे राज्य होते. तेथील राजा मकरंद तरुण होता. मकरंद एकदा गोरक्षला भेटायला गेला.
त्याने तिथे राजकन्या कांचनमालेला पाहिले. त्याला ती खूप आवडली. त्याने तिला मागणी घातली परंतु कांचनमालेने ती धुडकावली. त्याला मनोमन राग आला. त्याला नाकारण्याचे काहीच कारण नव्हते. यामुळे त्याने तिला. जबरदस्तीने आपल्या बरोबर नेले.
यामुळे राजा गोरक्ष, त्याची प्रजा खूप संतापली. राजकन्येला सोडवून
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/a2-300x245.jpg)
आणण्यासाठी त्यांनी कुंडलपुरवर आक्रमण केले.
कुंडलपुरला पूर्ण भक्कम तटबंदी असल्याने त्यांना बाहेरच थांबावे लागले. केवळ तटबंदीच नव्हे तर कडक पहारा होता. तटबंदीला मोठे मोठे दरवाजे होते. तिथे जास्त कडक सुरक्षा व्यवस्था होती.
यामुळे त्यांच्या आक्रमणाला यश आले नाही. ते काहीही करू शकले नाहीत. जेव्हा कधी संधी मिळेल, त्यावेळेस आपला शिरकाव होईल या आशेने सैन्य खूप दिवस बाहेर थांबले.
पण केवळ बाहेर थांबून राहिल्याने ते कंटाळले. पण राज्यकन्येला परत आणायचे हा त्यांचा निर्धार होता. आता आपल्या शक्तीचा उपयोग होत नाही म्हटल्यावर काही तरी युक्ती करायला हवी, असा त्यांनी विचार केला.
राजा गोरक्ष, त्याचे मंत्री, सेनापती सगळे एकत्र येऊन यावर विचार करू लागले. एकेक युक्त्या सुचत होत्या. पण त्यातून राज्याचे काही तरी नुकसान होईल असे दिसत होते.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/a4-300x224.jpg)
सेनापतीला मात्र एक युक्ती सुचली. राज्यातल्या सगळ्या निष्णात सुतारांना एकत्र बोलावले. लाकूड मागविले आणि सगळेजण कामाला लागले. लाकडाचा एक मोठा हत्ती त्याने बनवून घेतला. मोठ्या जाड लाकडी फळीवर हत्ती चढवून त्याला खाली चाकेही लावली.
हत्ती आतून पूर्णपणे पोकळ होता. तिथे आपल्या तरबेज सैनिकांना लपविले. फळी लावून हत्ती नीट बंद केला. काही सैनिकांनी रात्री तो हत्ती ढकलत तटबंदीच्या प्रवेश द्वाराजवळ नेऊन ठेवला. उरलेल्या बाकी सैनिकांना तिथून पुढे आपल्या राज्याच्या बाजूला जायला सांगितले.
हत्ती ठेवून ते तंबूकडे परतले. तंबू जाळले आणि ते झटकन पळून गेले. सकाळी सकाळी एवढी मोठी लागलेली आग, आकाशाकडे जाणाऱ्या ज्वाला बघून कुंडलपुरच्या सैन्याला, प्रजेला खूप आश्चर्य वाटले.
इतके दिवस बाहेर असलेल्या सैन्याला काय झाले म्हणून ते बाहेर येऊन बघू लागले. तर तंबू सगळे जळलेले… सैन्याचा पत्ता नाही… पण प्रवेशद्वाराजवळ मोठा हत्ती मात्र आहे.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/a1-300x218.jpg)
हत्तीच्या चारी बाजूंनी फिरून फिरून त्यांनी त्याच्याकडे पाहिले. पण त्यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना आली नाही. एवढा मोठा हत्ती त्यांना नेता आला नसावा म्हणून इथेच सोडून पळाले, असा राजा मकरंदचा समज झाला. तो ढकलत राज्यात आणला. हत्ती प्रवेशद्वारातून कसाबसा आत घेतला.
त्याला ओढून आणि ढकलून सगळेजण दमले. पण आपण जिंकलो शत्रू पळून गेला अशीही त्यांची भावना होती. रात्री सगळे शांत झोपले असताना हत्तीमधल्या सैनिकांनी ठेवलेली फळी हळूच उघडली. आणि आवाज न करता प्रवेशद्वार उघडून बाहेर जमलेल्या आपल्या सैन्याला आत घेतले.
दमलेले सगळे कुंडलपूर सैन्य, प्रजा शांत झोपलेले होते. त्यांच्यावर अंकलेश्वरच्या सैन्याने अचानक हल्ला केला. यामुळे कुंडलपुरचे सैन्य हतबल झाले. कुंडलपुरची खूप नासधूस झाली. राजा मकरंदच्या अविचारीपणाची शिक्षा सर्वांना भोगावी लागली. कांचनमालेला सोडवून घेऊन सैन्य जयजयकार करत परत फिरले.
बोध : हुशारीने अवघड परिस्थितीवर मात करता येते.
२. खेकड्याची हुशारी
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/b5-300x214.jpg)
एक सुरेख गाव होते. गावाच्या आसपास खूप तळी असल्याने त्याला तळेगाव असे म्हणत. तळ्यांमुळे गावात झाडी खूप होती.
तेथील एका तळ्यात खूप मासे, कासव, खेकडे राहत होते. मासे खूप वेगवेगळ्या रंगांचे होते. पाण्यात ते इकडून तिकडे फिरताना खूप छान दिसायचे. गावातली मुले येऊन तळ्याकाठी बसत. आणि माशांचा पकडापकडीचा गमतीदार खेळ बघत.
त्या तळ्याच्या जवळच एक बगळा राहत होता. तळ्यातला एखाद दुसरा मासा तरी तो रोज खात असे. त्यामुळे त्याची तब्येतही छान होती आणि तो खूप खुशीतही होता.
काही वर्षांनी बगळा म्हातारा झाला. त्याला पूर्वीसारखे मासे पकडून खाता येत नव्हते. मासे चपळाईने इकडून तिकडे जात. म्हातारा बगळा खूप लांब उडून जाऊ शकत नव्हता. यावर काय उपाय करावा असा विचार करतानाच
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/b1-300x245.jpg)
बगळ्याला युक्ती सुचली.
दुसऱ्या दिवशी दुःखी चेहऱ्याने तो तळ्याच्या काठी एका दगडावर बसला. त्याला तसे बसलेले पाहून एक कासव तळ्यातून वर आले आणि म्हणाले, अहो दादा, आज तुम्ही असे दुःखी का दिसताय ? काय होतंय तुम्हाला ?
कासव बगळ्याशी बोलताना काही खेकडे, मासेही तिथे जवळपास होतेच. बगळा लगेच म्हणाला, या सगळ्या माशांची मला काळजी वाटते. लवकरच इथे कोळी येऊन त्यांना जाळ्या लावून पकडून नेणार.
हे ऐकल्या ऐकल्या तिथे असलेल्या माशांनी विचारले, म्हणजे आम्ही सगळे मरून जाणार का? यातून बचावाचा काही उपाय असेल तर सांगा
ना…
मी तोच विचार करतोय बगळा म्हणाला. एकदम आनंदीत होत तो म्हणाला, एक करता येईल. पलिकडच्या बाजूला इथून थोड्या लांब अंतरावर
जे तळे आहे त्यामध्ये मी दररोज तीन-चार जणांना नेऊन सोडेन. आता मी खूप हेलपाटे घालू शकत नाही…
हो… पण मध्येच तुम्ही आम्हाला खाल्लं तर?..
एका चाणाक्ष माशाने विचारले. मी तुमची काळजी करतोय… तुमची मदत करतोय आणि तुम्हाला असे कसे वाटते? त्यातूनही मी एक – दोघांना घेऊन जातो. पुन्हा इथं परत आणतो. चालेल?
एवढे बोलून आपण अगदी साधे असल्याचा भाव आणून बगळा बसून राहिला. हुशार मासा म्हणाला, ठीक आहे… आम्हा दोघांना घेऊन चल.
बगळ्याला हेच हवे होते. त्याने त्याला चोचीत पकडले. उचलून नेले आणि थोड्या लांब असलेल्या तळ्यात सोडले. पुन्हा दुसऱ्या माशाला घेऊन त्या तळ्यात सोडले. दोघांना थोडा वेळ पाण्यात फेऱ्या मारू दिल्यावर बगळा म्हणाला, काय आवडले का हे तळे? चला परत जाऊ या.
त्या माशांना पुन्हा पहिल्या तळ्यात आणून सोडले आणि स्वत: तिथून लगेच निघून गेला. इकडे त्या दोघांनी बाकीच्या माशांना नवीन मोठ्या, छान
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/b2-300x210.jpg)
तळ्याचे वर्णन केले. आपण सगळे तिकडे आनंदात राहू शकू. याची त्या दोघा माशांनी खात्री दिली.
माशांना तिकडे जाण्याची घाई झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी बगळा आल्या आल्या आम्हाला न्या बगळेदादा अशी घाई सुरू झाली. पण बगळ्याने आधीच सांगितले होते की दररोज चार-पाच जणांनाच नेईन.
रोज तो तीन-चार जणांना नेऊन मध्येच एका दगडावर थांबून त्यांना फस्त करायचा. असे बरेच दिवस बरेच मासे त्याने खाल्ले.
एकदा नेहमीप्रमाणे तळ्याकाठी येणारी मुले आली. त्यांच्या बोलण्यातून खेकड्याला समजले की फक्त याच तळ्यात मासे आहेत. आणि आता इथलेही मासे कमी झाले आहेत. आता बगळेदादांना काही विचारणार कसे? असा विचार खेकड्याच्या मनात आला.
विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली. दुसऱ्या दिवशी तो बगळ्याला म्हणाला, दादा, आज मला घेऊन जा ना तिकडे. सगळ्यांची आठवण येत आहे.बगळ्याला आज जरा वेगळी म्हणजे खेकड्याची
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/b4-300x217.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/b3-300x214.jpg)
मेजवानी मिळेल म्हणून आनंद झाला.
त्याने ‘हो हो जरूर…’ म्हणत खेकड्याला उचलले. खेकडा त्याच्या पाठीवर बसला. आकाशात उंच भरारी मारली. जरा अंतरावर गेल्यावरही तळे दृष्टीस पडेना. तेव्हा खेकड्याने विचारले, दादा, किती लांब आहे तळे?
त्या खालच्या खडकाजवळ असे म्हणत बगळा खाली येऊ लागला. खडकाजवळ तळे बघताना खेकड्याला खडकावर माशांचे काटे दिसले. त्याला बगळ्याचा कावेबाजपणा कळला. पाठीवरून सरपटत तो बगळ्याच्या मानेवर आला आणि आपल्या नांगीत त्याने बगळ्याची मान घट्ट आवळली.
बगळा काही करू शकला नाही. खाली उतरता उतरता तो कोसळलाच. तो मेलेला पाहून खेकडा आपल्या तळ्याकडे आला. आणि सगळ्यांना कावेबाज बगळ्याला दिलेल्या शिक्षेचे वर्णन केले. खेकड्याच्या धूर्तपणामुळे बाकीच्यांचे प्राण वाचले. उरलेले मासे एकत्र आनंदात राहू लागले.
बोध : पटकन कोणावर विश्वास ठेवू नये.
३. भीमाची शक्ती आणि युक्ती
हस्तिनापूर नगरीत पांडू राजाचे राज्य होते. त्याला पाच मुलगे होते. पांडू राजाच्या मुलांना ‘पांडव’ म्हणून ओळखले जात होते. ते, त्यांची आई कुंती वेश पालटून वनवासात असताना एका गावात थांबले.
एका कुटुंबात त्यांना आसरा मिळाला. त्यांचे आदरातिथ्यही चांगले केले गेले. परंतु दुसऱ्या दिवशी ती सर्व मंडळी खूप खिन्न होती. कुंतीने त्यांना कारण विचारल्यावर कुटुंब प्रमुखाने सांगितले, शेजारच्या जंगलात बकासुर नावाचा राक्षस राहतो. गावातल्या एकेका घरातून गाडाभर अन्न आणि एक माणूस त्याला खायला दररोज पाठवावा लागतो. आज आमची पाळी आहे. जर ते पाठवले नाही तर तो गाव उध्वस्त करेल.
ते ऐकून कुंती म्हणाली, काही काळजी करून नका. मला हे पाच मुलगे आहेत. त्यांच्यापैकी एक जाईल बकासुराकडे…
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/c1-300x242.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/c3-300x258.jpg)
लगेच तो म्हणाला, नाही ताई … तुम्ही आमचे पाहुणे आहात. कुंती म्हणाली, तुम्ही आमचे आदरातिथ्य खूप केलेत. माझा मुलगा भीम पराक्रमी शक्तिशाली आहे. तोच जाईल, नाही… म्हणत शेवटी कुटुंबप्रमुख या
गोष्टीला तयार झाला.
भीमाला हे समजताच त्याला खूप आनंद झाला. राक्षसांशी लढाई करायला त्याला फार आवडायचे. आईचा आशीर्वाद घेऊन भीम निघाला.
बकासुराच्या जेवणाचा गाडा घेऊन भीम निघाला. त्याने गाडा खूप हळू हाकत बकासुराकडे जाण्यास उशीर केला. एका मोठ्या वृक्षाखाली बकासुर भोजनाची वाट बघत होता. भोजनास उशीर झाल्याने तो रागावला होता.
बकासुराला दिसेल अशा जागी भीमाने गाडा थांबवला आणि स्वतः जेवू लागला. बकासुराला आधीच भूक लागलेली. त्यात त्याचे जेवण भीम खातोय बघून तो खूप रागावला. चवताळून जाऊन तो भीमाकडे गेला.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/c2-300x232.jpg)
भीमाच्या पाठीवर त्याने बुक्के मारले. पण भीम तसाच बसून खात होता. एक मोठा दगड त्याने भीमावर भिरकावला. पण भीमाने तो चुकवला.
सगळे जेवण जेवल्यावर भीम उठला. भीमाला बघून बकासुराला वाटले, हा एवढासा लहान मुलगा. हा मला काय करू शकणार?; पण भीमाची ताकद त्याला माहीत नव्हती.
भीमाने पुढे होऊन त्याला दोन्ही हातांनी उचलून गरगर फिरवले. तेही अगदी सहजपणाने! आणि जोराने जमिनीवर आपटले. जमिनीला त्या जागी एक मोठा खड्डा पडला. बकासुर खूप मोठ्याने किंचाळला. तो आवाज सगळीकडे ऐकू गेला. त्याला ठार मारून भीम गावात आला. लोकांनी उत्साहाने त्याचे स्वागत केले. त्याचे खूप आभार मानले.
बोध : पराक्रम, शक्ती आणि युक्तीने दुष्टांना धडा शिकवता येतो.
४. मूर्खपणाचे फळ
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कंबलपूर नगरीचा राजा जगदीश होता. जगदीशला लहानपणापासूनच सोन्या – नाण्याची खूप हाव होती. तो आपल्या प्रजेच्या सुखासाठी काय वाटेल ते करायचा. पण आसपासच्या राजांकडे त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती होती, याचे मात्र त्याला मनापासून वाईट वाटायचे. सगळ्यांपेक्षा आपण श्रीमंत असावे ही त्याची इच्छा होती.
एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला होता. घनदाट जंगलात आज शिकार चांगली मिळेल या विचारात असताना समोरून एक काळवीट जाताना दिसले. जगदीशने सोडलेला बाण सूं… सूं… करत वर्मी लागला आणि काळवीट खाली पडले.
अगदी सुरुवातीला शिकार मिळाली म्हणून राजाने बघेपर्यंत काळवीटाच्या
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/d1-300x243.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/d2-300x278.jpg)
जागी एक गंधव उभा दिसला. राजा बघतच राहिला. गंधर्व लगेच म्हणाला, शापातून तुझ्यामुळे मला मुक्ती मिळाली. बोल, तुला काय हवे? तुला हवा तो वर मिळेल.’
राजा जगदीशला आज असे काही घडेल असे वाटलेही नव्हते. एकदम काही सुचले नाही. पण केवळ दोन मिनिटात तो गंधर्वाला म्हणाला, मी ज्या वस्तूला हात लावीन ती सोन्याची होईल असा वर हवाय. त्याचा वर ऐकल्यावर गंधर्व त्याला म्हणाला, राजा, मी थांबतो थोडा वेळ पण विचार नीट कर आणि मग वर माग.
राजाच्या डोळ्यांसमोर सर्व वस्तू सोन्याच्या झालेल्या आणि त्यामुळे सगळ्या राजांपेक्षा आपण अधिक श्रीमंत झाल्याचे चित्र येत होते. त्यामुळे तो म्हणाला, मी बरोबरच वर मागितला आहे.यावर गंधर्व म्हणाला, पुन्हा
सांगतो नीट विचार कर. नाहीतर पश्चाताप करावा लागेल. तरीही राजाचा निर्णय ठाम होता.
असा थोडा वेळ गेला तरी राजा आपल्या मतावर ठाम होता. शेवटी गंधर्वाने तथास्तु! तुझी इच्छा पूर्ण होईल. ज्या वस्तूला तू हात लावशील ती सोन्याची होईल. असा वर दिला आणि लगबगीने तो निघून गेला.
राजा जगदीश खूप खूष होता. या खुषीत तो राजवाड्यावर जायला निघाला. पण वर खरा झाला आहे का नाही याची परीक्षा बघावी एका डेरेदार वृक्षाला हात लावला.
म्हणून त्याने
काय आश्चर्य! राजाने हात लावताच तो वृक्ष सोन्याचा झाला. राजाला खूप आनंद झाला. आता सगळ्यांपेक्षा माझ्याकडे जास्त सोने असेल. हा वृक्ष सोन्याचा झाला. याप्रमाणे मी स्पर्श करताच खूप वस्तू सोन्याच्या होतील. एवढा मोठा सोन्याचा वृक्ष फक्त माझ्याकडेच. कोणाकडेही नाही. अशा विचारात तो
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/d3-300x235.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/d4-300x279.jpg)
राजवाड्यात परतला.
राजवाड्यात आल्यावर नेहमीप्रमाणे जेवणाची तयारी झालेली होती. राज जेवायला बसला. त्याने ताटाला हात लावताच ते सोन्याचे झाले. मग त्या पाणी पिण्यासाठी भांडे हातात घेतले तर ते सोन्याचे झाले. आता तर राजाच्या आनंदाला पारावर उरला नाही. इतक्या सोन्याच्या वस्तू कोणाकडेही नसतील.
आता त्याने जेवणाला हात लावला आणि घास घेणार तर ते सगळे सोन्याचे झाले. त्याला जेवताही आले नाही. पाण्याला हात लागताच तेसुद्ध सोने झाले. यामुळे त्याला काही खाता-पिता आले नाही. तो जेवणावरू उठला. तेवढ्यात त्याची लाडकी कन्या तिथे आली.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/d5-291x300.jpg)
खूप वेळाने वडील भेटल्यामुळे तिने त्यांना मिठी मारली. साहजिकच राजानेही तिला स्पर्श केला. आणि क्षणात तिचे रूप पालटले. ती सोन्याची चकचकीत मूर्ती झाली. ताबडतोब राजाला गंधर्वाचे बोल आठवले. पण आता वेळ निघून गेली होती. राजाला पश्चाताप होऊन उपयोग नव्हता. राजाचा जिथे जिथे हात लागला, त्या सर्व वस्तू सोन्याच्या होत गेल्या. ती सुवर्णनगरी झाली पण राजाने सर्व सुख गमावले. राजाने बुद्धी गहाण टाकली आणि तो दु:खी झाला. मूर्खपणाने त्याने संकट ओढवून घेतले.
बोध : अती लोभाने दुःख वाट्याला येते.
५. एकलव्याची जिद्द
घनदाट जंगलात भिल्ल लोक राहत होते. जंगलातच राहत असल्यामुळे पक्षी, प्राण्यांची शिकार करून उदरनिर्वाह करत होते.
सगळे भिल्ल लहानपणापासूनच धनुर्विद्या शिकत होते. त्यांच्यामध्ये एकलव्य नावाचा तरुण भिल्ल होता. त्याला धनुर्विद्येत प्रवीण व्हायची इच्छा होती. त्याला मनापासूनच गोडी असल्याने याचे शिक्षण कोठे मिळेल याचा तो शोध घेत होता.
त्यानुसार द्रोणाचार्य हे धनुर्विद्येचे शिक्षण देतात म्हणजे तरबेज करतात आणि सध्या ते हस्तिनापुरात कौरव – पांडवांना शिक्षण देत आहेत, हे त्याला समजले.
धनुर्विद्या शिकावी यासाठी तो द्रोणाचार्यांकडे गेला. धीटपणाने पुढे जाऊन
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/e4-300x256.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/e3-300x243.jpg)
नमस्कार करून त्यांना म्हणाला, आचार्य, मी एकलव्य आहे. माझा शिष्य म्हणून आपण स्वीकार करावा. आपल्याकडे मला धनुर्विद्येचे शिक्षण
मिळावं…
द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे पाहात विचारलं, तू कोण आहेस?
एकलव्याने नम्रतेने उत्तर दिले, मी भिल्लकुमार आहे. शेजारच्या जंगलात आमची वस्ती असून तिथून मी आलोय.
अरे…! मी फक्त राजकुमारांना धनुर्विद्या शिकवतो. तू राजकुमार नाहीस. तेव्हा मी तुला माझा शिष्य बनवू शकत नाही.
द्रोणाचार्यांचे बोलणे ऐकून एकलव्याला वाईट वाटले. त्यानेही दृढ निश्चय केला, मी तरबेज धनुर्धारी होणार आणि ती विद्या गुरू द्रोणाचार्यांकडूनच घेणार!
त्याने गुरु द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती घडवली. त्यांच्या वस्तीजवळ एक
उठून
डेरेदार वडाचे झाड होते. त्याच्याभोवती पारासारखी जमीन होती. त्यावर त्या मूर्तीची स्थापना केली. हेच त्याचे गुरू द्रोणाचार्य ! रोज सकाळी आवरून त्या मूर्तीच्या पाया पडून तो धनुर्विद्येचा अभ्यास करायचा. गुरू आपल्याकडे लक्ष देत आहेत आणि शिकवत आहेत, या भावनेने तो स्वतःचा स्वत: अभ्यास करत होता.
गुरू आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. ती विद्या अचूकपणे आत्मसात करायची आहे ही त्याची भावना होती. लवकरच तो नेम बरोबर धरू लागला. रोजच्या रोज सराव केल्याने तो धनुर्विद्येत पारंगत झाला. पण तरीही आपण पारंगत झालो आहोत अशी त्याची भावना नव्हती.
थोड्या दिवसांनी गुरू द्रोणाचार्य आणि राजकुमार जंगलात शिकार करण्यासाठी आले. शिकारी कुत्राही त्यांच्याबरोबर होता. एकलव्य नेहमीप्रमाणे सराव करत होता. एकलव्याकडे बघून कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/e2-300x246.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/e5-300x235.jpg)
एकलव्यानेही लगेच नेम धरला आणि बाण सोडला. बाण अचूकपणे कुत्र्याच्या तोंडावर अडकला. एका पाठोपाठ एक असे सहा बाण त्याने सोडले. त्यामुळे बाणांनी कुत्र्याचे तोंड बंद झाले.
पण कुत्र्याच्या तोंडातून रक्ताचा एक थेंबही आला नव्हता.
कुत्रा घाबरून मागे फिरला आणि गुरू, राजकुमार होते तिथे गेला. त्याची अवस्था बघून सगळे आश्चर्यचकित झाले. बाण लागले पण रक्त आले नव्हते. गुरू द्रोणाचार्य म्हणाले, इथे कोणीतरी निष्णात धनुर्धारी आहे.
बाण कोणी मारला हे शोधत शोधत ते पुढे आले तर त्यांना सराव करणारा एकलव्य दिसला. गुरू द्रोणाचार्यांनी पुढे होऊन त्याला विचारले, आमच्या कुत्र्याचे तोंड तूच बाणाने बंद केलेस ना?
एकलव्याने गुरू द्रोणाचार्यांना ओळखले. वाकून त्यांना नमस्कार करून तो म्हणाला, होय गुरूदेव!
तुला ही विद्या कुणी शिकविली ? काय आहे त्यांचं नाव ? गुरूदेवांनी विचारले.
पुढे
वटवृक्षाखाली बसवलेल्या मूर्तीकडे बोट दाखवत तो म्हणाला, ते माझे गुरू आहेत. ते मला धनुर्विद्या शिकवतात.
मूर्ती निरखून बघत गुरू द्रोणाचार्य म्हणाले, ही तर माझीच मूर्ती बनवली आहेस तू!
एकलव्य म्हणाला होय! मी तुम्हाला गुरू मानलं आणि मूर्तीच्या म्हणजे तुमच्या कृपेने मी विद्या शिकलो.
एकलव्याचा विनय, आपल्यावरील श्रद्धा, भक्ती बघून त्यांना त्याच्याबद्दल आदरच वाटला. पण लगेचच हा मुलगा कौरव पांडवांना मागे टाकेल हा विचार त्यांच्या मनात डोकावला.
विचार करून ते एकलव्याला म्हणाले, आता तू मला गुरूदक्षिणाही
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/e6-300x242.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/e1-300x222.jpg)
द्यायला हवीस. यावर एकलव्याला आनंद झाला. उत्स्फूर्तपणे तो म्हणाला, सांगा गुरूदेवा, मी आपणास काय गुरूदक्षिणा द्यावी?
द्रोणाचार्यांनी त्याला गुरूदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. क्षणाचाही विचार न करता, विलंब न करता एकलव्याने उजव्या हाताचा अंगठा कापून गुरूचरणी अर्पण केला.
त्याची ‘गुरूदक्षिणा’ बघून सगळे आणि द्रोणाचार्यही आश्चर्यचकित झाले. एकलव्या, तू दिलेली गुरूदक्षिणा म्हणजे एक बलिदानच होय. जोपर्यंत चंद्रसूर्य आकाशात आहेत, तोपर्यंत तुझ्या त्यागाचे स्मरण सगळे लोक करतील. तरबेज, श्रेष्ठ धनुर्धारी म्हणून तुझी जगात कीर्ती होईल, असा माझा आशीर्वाद आहे.
एकलव्याने गुरूंना वंदन केले.
बोध : एकाग्रता, जिद्द, मेहनतीने अवघड गोष्ट साध्य होते.
६. बिरबलाचे चातुर्य
अकबर बादशहाच्या दरबारात विद्वान, ज्ञानी लोक होते. त्यामध्ये बिरबलही होता. पण बिरबल हजरजबाबी, चतुर होता. सर्वांमध्ये बिरबलाला मानाचे स्थान होते. दरबारात सगळेजण आल्यावर बादशहाची स्वारी येत असे. त्यानुसार सगळे सरदार वगैरे आले. बिरबलही आला. त्यानंतर बादशहाचे आगमन झाले.
बादशहा येण्यापूर्वी बिरबलाला बादशहाच्या सिंहासनावर बसण्याची इच्छा झाली. इतक्या सुरेख, मऊ सिंहासनावर बसल्यावर कसे वाटते, असे सारखे वाटू लागले.
एक दिवस सगळे गेल्यावर तो एकटाच दरबारात होता. हीच आपल्याला संधी मिळाली, सिंहासनावर बसण्याची. त्याने लगेच संधीचा फायदा घेऊन सिंहासनवर बसला.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/f3-300x244.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/f2-300x244.jpg)
पण नेमके त्याचवेळी एक सरदार तिथे आला. बिरबल सिंहासनावर बसलेला त्याने पाहिले. बिरबलासारखा सगळ्यांमध्ये चतुर असलेला बादशहाच्या सिंहासनावर बसतो, त्याला हे आवडले नाही. बिरबलाला धडा शिकवण्याची संधी तो कशी सोडणार?
पटकन् पुढे होऊन त्याने बिरबलाला सिंहासनावरून खाली ओढायला सुरुवात केली. क्षण दोन क्षण बिरबल अजिबात हालला नाही. तेव्हा त्याने बिरबलाला जोराने ओढून मारायला सुरु केले. दोघांचा आरडाओरडा ऐकून बाहेर गेलेले सगळेजन मागे फिरले. त्यामध्ये बादशहासुद्धा होता.
बादशहाला सरदाराने सांगितले, आपल्या सिंहासनावर बसण्याचे बिरबलासारख्याचे धारिष्ट्य कसे होते? सिंहासनाचा, तुमचा हा अपमान आहे. त्यासाठी योग्य ती शिक्षा त्याला द्यायला हवी.
हे ऐकून बादशहा बिरबलाला म्हणाला, खरंय… ही तुझी चूक आहे.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/f1-300x244.jpg)
का
याबद्दल तुला शिक्षा होणार; पण तुझ्या कृतीबद्दल काही सांगायचे आहे
बिरबल म्हणाला, जहाँपनाह! तुमच्याबद्दल मला आदरच आहे. पण या सिंहासनावर बसल्यावर आपल्या मनात कसे विचार येतील, यावर बसल्याने आपल्यावर काय जबाबदाऱ्या येतात, त्यानुसार काय सुख – दुःख होते एवढेच मला बघायचे होते. ‘
बादशहाने लगेच विचारले, मग काय बघितलेस ?
बिरबल लगेच म्हणाला, मी नुसता बसतो तोच मला मार बसला. तेवढ्यासाठी काय चालू आहे हे आपण बघत आहात. तर तुम्हाला किती यातना सहन कराव्या लागत असतील याची कल्पना आली.
बिरबलाच्या या उत्तराने सगळे खजिल झाले. बिरबलाने बादशहाची शाबासकी मिळवली.
बोध: हजरजबाबीपणा संकट दूर करतो.
७. नदी आणि भिंत
खूप वर्षांपूर्वी एक मोठा देश होता. त्यामध्ये अवंती नावाचे एक राज्य होते. यामध्ये एक मोठी नदी वाहत होती. ती इतकी मोठी होती की छोटा सागरच वाटे.
नदीच्या पुराचे पाणी राज्यात यायचे. त्यामध्ये खूप नुकसान व्हायचे. यासाठी राजाने एक भक्कम भिंत बांधली होती. त्यामुळे राज्याचे संरक्षण व्हायचे.
थंडीचे दिवस होते. हेमंत नावाचा १२ – १३ वर्षांचा मुलगा भिंती जवळच्या रस्त्याने संध्याकाळी घरी जात होता. रस्त्यावरच्या मातीमध्ये त्याला थोडा ओलेपणा जाणवला. ‘आता इथे ओलेपणा कसा’ या विचाराने तो
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/g5-1-300x237.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/g2-282x300.jpg)
अस्वस्थ झाला.
तो ओलेपणा कुठून आला हे निरखत असताना, तो भिंतीपासून आला आहे हे त्याने जाणले. तो बघत गेला तर त्याला नदीच्या रक्षक भिंतीला खालच्या बाजूला एक लहान भोक पडले होते.
‘इथूनच पाणी आत शिरले’ हे त्याने जाणले. आता यावर काहीतरी उपाय लगेच करायला हवा. पाण्याच्या दाबामुळे हे भोक कदाचित वाढेल. त्यातून पाण्याच्या जोराने ते भोक मोठं झालं तर भिंत पडेल… पाणी शिरेल. संपूर्ण नुकसान होईल.’ असा विचार त्याच्या मनात आला.
तो आरडाओरडा करून लोकांना बोलवू लागला. पण तिथे जवळपास कोणीही नव्हते. शिवाय त्याचा आवाजही फार मोठा नव्हता. त्याच्याजवळ जे पेन, पेन्सिल होते ते त्याने त्यात घातले. पण पाण्याच्या जोराने ते बाहेर फेकले गेले. रुमालाचे टोक बारीक करून घातले. पण सगळे बाहेर फेकले जात होते.
शेवटी तो भिंतीजवळ आडवा पडला आणि एक बोट त्यामध्ये घालून ठेवले. पाण्याच्या भारामुळे ते बाहेर आले नाही. तशा स्थितीत त्याला खूप आनंद वाटला. अंधार पडून रात्र झाली तरी तो तसाच आडवा झोपून राहिला.
त्या वेळेला त्याला आईचा मायेचा हात, बाबांचे प्रेमळ बोलणे, घराचा उबदारपणा आठवला. पण चिकाटीने तो तसाच आडवा पडला. त्याच जागी त्याला झोप कधी लागली समजले नाही.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/g3-300x282.jpg)
रात्री घरी आला नसल्याने वडील शोधायला पहाटेच बाहेर पडले. त्यांना लोकांनी हेमंतबद्दल सांगितले. तो बेशुद्धावस्थेत होता. त्याला उचलताना त्याने अडकवलेले बोट सर्वांना दिसले.
हेमंतने तसे केले नसते तर थोड्या वेळाने ते भोक मोठे झाले असते. त्यामुळे नदीच्या भिंतीला भगदाड पडून पाणी वस्तीत शिरले असते. लोक बुडाले असते. मोठे नुकसान झाले असते. लोकांनी हे सर्व ओळखून हेमंतच्या प्रसंगावधानाचे, धैर्याचे कौतुक केले.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/g4-300x300.jpg)
बोध : प्रसंगावधानाने संकटे दूर होतात.
८. घेवड्याचा वेल
एका गावात गंपू नावाचा छोटा मुलगा राहत होता. त्याला आई-वडील नव्हते. त्याचे काकाच त्याचा सांभाळ करत होते. गंपूला वाटायचे आपण लवकर मोठे व्हावे. तो मग काकांकडे जायचा आणि त्यांना विचारायचा. काका मला सांगा, मी कधी मोठा होणार? त्यावर काका म्हणायचे, तू शहाणा झालास की. गंपूला हे उत्तर काही पटायचे नाही. निष्पापपणे तो विचारायचा, काका, मी वेडा आहे का आत्ता? काका म्हणायचे, नाही रे बाबा, आता पण तू शहाणाच आहेस.
पण जेव्हा तुला दाढी, मिशा यायला लागतील ना तेव्हा तू मोठा होशील. पण तुला तुझे उत्तर मिळायला ह्या घेवड्याच्या शेंगा मदत करतील, पण त्यासाठी तुला वाट पाहावी लागेल.
गंपू विचारात पडला. माझ्या मोठे होण्याचा आणि ह्या घेवड्याच्या शेंगांचा काय संबंध? जाऊ दे, आत्तापासून कशाला त्याचा विचार करा. पुढचे पुढे बघता येईल. काका म्हणतात ना तुला वाट पाहावी लागेल. मग पाहायची वाट. घाई कशाला?
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/h3-300x223.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/e5-300x235.jpg)
अशीच काही वर्षे निघून गेली. गंपूला आता वाटायला लागले, की आता घरातून बाहेर पडले पाहिजे. काहीतरी कमवायला लागले पाहिजे. आता तो कमविण्यासाठी बाहेर पडणार तोच त्याचे काका नेमके आजारी पडले. आता काका आजारी असताना त्यांना सोडून कसे जायचे ? त्याने त्याचा विचार
तात्पुरता बदलला.
गंपूला जाणवत होते, की काकांना औषधपाणी केले पाहिजे. त्याशिवाय काका बरे कसे होणार. त्याला आता काळजी वाटू लागली. काकांच्या औषधासाठी पैशांची सोय कशी करायची? एकदम त्याला काका जे म्हणायचे त्याची आठवण आली. काका नेहमी म्हणायचे, तू मोठा झालास हे तुला समजण्यासाठी तुला घेवड्याच्या शेंगा मदत करतील. गंपू त्या घेवड्याच्या वेलापाशी गेला. घेवड्याच्या वेलाचे तो निरीक्षण करू लागला. वेलाला खूप शेंगा लगडल्या होत्या. वेल खूप उंच गेला होता.
शेंगा काढल्या. चांगल्या मोठ्या टोपलीभर शेंगा निघाल्या होत्या. त्या शेंगा बघितल्यावर त्याच्या लक्षात आले, ह्या शेंगा म्हणजेच पैसे. तो त्या शेंगा घेऊन बाजारात गेला. ताज्या ताज्या शेंगा पाहून ग्राहकांनी विकत घेतल्या. तासाभरातच सगळ्या शेंगा संपल्या. आता गंपूकडे पैसे होते. त्याला खूप आनंद झाला.
गंपूने काकांसाठी औषधे घेतली. धावत धावत घरी आला. काकांना औषध दिले. काकांना औषध लागू पडले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. आता आपण काकांसाठी काहीतरी केले, याचे गंपूला समाधान वाटत होते.
दोन-तीन दिवसात काका बरे झाले. काकांची विचारपूस करण्यासाठी तो काकांच्या खोलीत गेला. काका म्हणाले, ये गंपू, बस. तुला आठवतंय तू लहानपणी विचारायचास, काका, मी कधी मोठा होणार? आता तुला तुझे उत्तर मिळाले ना?
गंपू काकांच्या पाया पडला. म्हणाला, हो काका, त्या घेवड्याच्या वेलाने मला सांगितले, तू मोठा झालास.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/h1-300x246.jpg)
९. मूर्ख मोरू
मोरेश्वर नावाचा एक मुलगा होता. सगळेच त्याला मोरू म्हणायचे. मोरू म्हणजे मुलखाचा वेंधळा. सारासार विचार करण्याची त्याची कुवतच नव्हती. कोणतेही काम सांगा, मोरू काहीतरी गोंधळ करून ठेवणारच.
मोरूच्या आईने मोरूला मावशीकडे पाठवले. आईने त्याला सांगितले, हे बघ मोरू, मी ज्या ज्या वस्तू देणार आहे त्या अगदी व्यवस्थित मावशीला नेऊन मोरू म्हणाला, चालेल. तू जे सांगशील ते मी नीट करेन.’
आईने एक कुत्र्याचे पिल्लू दिले आणि सांगितले, ह्याच्या पट्ट्याला नीट साखळी बांधून त्याला ने. हे लोणी आहे ते नीट पिशवीतून ने. उन्हातून नेऊ नकोस नाहीतर ते वितळेल. ह्या चकल्या आहेत. त्या दाबू नकोस नाहीतर फुटतील. जाशील ना नीट ?
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/k1-300x251.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/k2-300x279.jpg)
मोरू म्हणाला, ठीक.मोरूने काय केले. कुत्र्याच्या पिल्लाला पिशवीत ठेवले. ऊन लागू नये म्हणून टोपी घातली होती. आईने सांगितले होते ऊन लागलं तर लोणी वितळेल. म्हणून त्याने लोणी टोपीच्या आत ठेवले. आता राहिल्या चकल्या. त्या दाबू नकोस नाहीतर फुटतील असे आई म्हणाली ना. मग त्याने त्या चकल्यांना साखळी बांधली.
मोरू निघाला मावशीकडे जायला. वेळ होती दुपारची. ऊन रणरणत होतं. मोरूने चकल्यांना साखळी बांधलेली होती. त्यामुळे रस्त्यातून त्या नेता नेताच तुकडे तुकडे होऊन गेल्या. आता नुसती साखळी राहिली. तीच ओढत ओढत तो चालला होता.
पिशवीत ठेवलेले कुत्र्याचे पिल्लू आत उड्या मारायला लागले. त्याने पिशवीच्या बाहेर डोके काढले. आणि जोरजोरात भुंकू लागला. त्याच्या नखाने ती पिशवी फाटून गेली. कुत्र्याचे पिल्लू पिशवीतून बाहेर आले आणि पळत सुटले. मोरू कुत्र्याच्या मागे धावत होता. पण कुत्रा काही हाती लागला नाही. रस्त्यात लोक बघत होते आणि हसत होते. कारण कुत्र्याला साखळीला न बांधता त्याच्या मागे नुसताच पळत होता.
आता तर मोरूचा अवतार बघण्यासारखा झाला होता. डोक्यावरच्या टोपीखाली त्याने लोणी ठेवले होते. ते उन्हामध्ये पार वितळून मोरूच्या चेहऱ्यावरून ओघळत होते. त्यामुळे मोरू अगदी ध्यान दिसत होता.
मोरू तसाच हात हलवत मावशीच्या घरी गेला. मावशीने दार उघडले तर पूर्ण वितळलेल्या लोण्यामुळे तेलकट झालेला मोरू दारात उभा. मावशीने विचारले, हातात नुसतीच साखळी आहे. कुत्रे कुठे आहे ? आणि हे काय पिशवी तर रिकामीच आहे. पिशवी एवढी फाटली कशी? आणि आई तर
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/k3-300x265.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/k4-300x257.jpg)
म्हणाली होती चकल्या पाठवते म्हणून. त्या कुठे आहेत? काय रे, येता येता खाऊन टाकल्यास की काय?
मोरूने सगळी हकीकत सांगितली. मावशी तर मटकन् खालीच बसली. म्हणाली, अरे मूर्खा, लोणी गेले, चकल्या गेल्या, कुत्र्याचे पिल्लू गेले. सगळेच मुसळ केरात. कसा रे असा तू मूर्ख! तिने तर कपाळालाच हात
लावला.
मोरू म्हणाला,मावशी, तू अजून काम सांग. बघ, मी अगदी नीट करतो. मावशी म्हणाली, राहू दे तुझं काम. घरी तरी नीट जा मूर्खा !
१०.तीन भावांचे कौशल्य
राजाभाऊंना तीन मुलगे होते. तिन्ही मुले आता मोठी झाली आहेत; तेव्हा आता घराची सर्व जबाबदारी त्यांनी सांभाळावी अशी राजाभाऊंची इच्छा होती. बापाच्या चपला मुलाच्या पायाला येऊ लागल्या की तो मित्र बनतो. राजाभाऊंनी आपल्या सगळ्या मुलांना जवळ बोलाविले. मुलांनी विचारले, बाबा, आज काही विशेष?
अरे, आता तुम्ही मोठे झालात. आता आपण मित्रत्वाच्या नात्याने बोलू शकतो ना? त्यावर मुलांनी देखील आपली पसंती दर्शविली.
राजाभाऊंनी त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याविषयी जाणून घेतले. त्यांची मते विचारात घेतली; आणि म्हणाले, आता खरेच तुम्ही घराची जबाबदारी | घेण्यास योग्य झाले आहात. मला या जबाबदारीतून मोकळे करा.’ मुले म्हणाली, हो बाबा, तुम्ही मार्गदर्शन करा. तुम्ही जे सांगाल ते आम्ही
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/j1-1-300x239.jpg)
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/j2-1-300x265.jpg)
करू. बाबा म्हणाले, ठीक आहे. तुम्ही तिघांनी मिळून घराची जबाबदारी सांभाळायची आहे. पण मी तुमचे कौशल्य बघणार आहे. ज्याचे कौशल्य मला आवडेल त्याच्यावर मुख्य जबाबदारी सोपवीन. आहे मान्य?
मुलांनी त्यासाठी काही दिवसांची मुदत मागून घेतली. राजाभाऊ म्हणाले, ‘ठीक आहे. तुम्हाला किती मुदत हवी तेवढी घ्या. पण तिघांनी आपले कौशल्य एकाच वेळी दाखविले पाहिजे. मुलांनी तीन महिने मुदत मागून घेतली. त्यानंतर कोणत्या दिवशी कौशल्य दाखवायचे ते देखील ठरले.
तीन महिने तिघांनी कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी खूप मेहनत घेतली. मुले प्रयत्न करीत आहेत, कष्ट घेत आहेत हे पाहून राजाभाऊ सुखावत होते. आता त्यांची उत्सुकता वाढू लागली. आपल्या मुलांचे कौशल्य पाहण्यासाठी अधीर झाले होते.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/j3-300x240.jpg)
कौशल्य दाखविण्याचा दिवस आला. राजाभाऊ मुलांचे कौशल्य पाहण्यासाठी येऊन बसले. त्यांचा मोठा मुलगा विजय घोडेस्वार होता. तो चौफेर भरधाव धावणाऱ्या घोड्यावर बसून आपल्या पायातील बूट काढत होता. त्याचे हे कौशल्य पाहून राजाभाऊ खुष होतील याची त्याला खात्री होती.
दुसरा म्हणजे मधला मुलगा अजय नाभिक होता. तो कौशल्य दाखविण्यासाठी पुढे आला. त्याने पळणाऱ्या सशाच्या मिशा अचूक कापल्या. त्याला देखील वाटत होते, आपल्या कौशल्यावर राजाभाऊ खुष होतील.
तिसरा आणि धाकटा मुलगा सुजय तलवारबाजीत पारंगत होता. तो आता कौशल्य दाखविण्यासाठी मैदानात आला आणि अचानक पाऊस पडू लागला. पण सुजयने आपली तलवार अशी काही सफाईने फिरविली, की पावसाचा एकही थेंब त्याच्या अंगावर पडला नाही. तो एवढ्या पावसात देखील कोरडा राहिला.
त्याच्या कौशल्यावर राजाभाऊ खुष झाले. ते म्हणाले, हाच माझा मुलगा घर व्यवस्थित सांभाळू शकेल. घरावर कितीही संकटे आली तरी हा आपल्या कौशल्याने ती परतवून लावेल आणि घराचे, घरातील सगळ्यांचे रक्षण करू शकेल.
विजय, अजय दोघांनीही त्याचे कौशल्य मान्य केले. सुजय लहान असला तरी तो घराची जबाबदारी नक्की सांभाळेल असे आम्हाला देखील वाटते, असे म्हणाले. त्या दोघांनी सुजयला साथ द्यायची ठरविले आणि तसे त्याला वचनही दिले.
![bodh katha | बोधकथा marathi manoranjan ,मराठी मनोरंजन](http://marathimanoranjan.com/wp-content/uploads/2023/11/j4-300x244.jpg)
मित्रानो जर तुम्हाला आमच्या गोष्टी आवडल्या असतील तर आम्हाला तुमचा विचार कळवा . मराठी मनोरंजन यावरील गोष्टी तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.